
मुंबई – क्युरियस आयज सिनेमा निर्मित मन्नू क्या करेगा? या चित्रपटामध्ये व्योम आणि साची बिंद्रा मुख्य भूमिकेत आहेत, ट्रेलरला आणि अल्बममधील पहिल्या गाण्यांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर प्रेक्षकांची उत्सुकता या चित्रपटाबद्दल अधिकच वाढवतेय. ‘हमनवा’, ‘सैयाँ’, ‘फना हुआ’, आणि ‘तेरी यादें’ ही गाणी आधीच श्रोत्यांच्या मनात घर करून बसली आहेत.

या मधुर प्रवासात भर टाकत निर्मात्यांनी आता आणखीन दोन नवी गाणी प्रदर्शित केली आहेत – ‘गुलफाम’ आणि ‘हल्की-हल्की बारीश’, जी ललित पंडित यांच्या बहुआयामी संगीत प्रतिभेचं दर्शन घडवतात.
‘गुलफाम’ हे स्टेबिन बेनच्या मधुर आवाजातलं, मनाला भिडणारं गाणं आहे, ज्याचे भावस्पर्शी बोल स्वतः लिजेंडरी जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. आत्म्याला भिडणाऱ्या सुरावटींनी सजलेलं हे गाणं अल्बमचं सौंदर्य अधिक खुलवतं.

‘हल्की-हल्की बारीश’ हे रोमँटिक बॅलेड आहे, ज्यात शान आणि अक्षरी कक्कर यांच्या सुरेल आवाजाने जादू केली आहे. पुन्हा एकदा जावेद अख्तर यांच्या शब्दांनी या गाण्याला प्रेम आणि ओढीचा हळवा स्पर्श दिला आहे, जे श्रोत्याच्या मनाला भिडेल.
अल्बमच्या संकल्पनेविषयी बोलताना संगीतकार ललित पंडित म्हणाले, “मन्नू क्या करेगा? या चित्रपटासाठी आमचं ध्येय असं होतं की, आजच्या प्रेक्षकांशी जुळणारं पण त्याचवेळी जुन्या चालींचं माधुर्य जपणारं एक साऊंडट्रॅक तयार करायचा. ‘गुलफाम’ भारतीय संगीताची खासियत आणि आत्मा व्यक्त करतं, तर ‘हल्की-हल्की बारीश’ प्रेमाच्या कोमल भावनांना स्पर्श करतं. या अल्बममधील प्रत्येक गाणं काळजीपूर्वक तयार केलं आहे, जेणेकरून ते दीर्घकाळ लोकांच्या हृदयात राहील.”
विनय पाठक, कुमार मिश्रा, राजेश कुमार आणि चारू शंकर यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय रोमँटिक म्युझिकल शैलीला नवा आयाम देणार असे वाटते.
नवीन चेहरे, हळवे भाव आणि केंद्रस्थानी संगीत असलेला मन्नू क्या करेगा? हा चित्रपट या वर्षातील सर्वात हृदयस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण देशभर प्रदर्शित होत आहे.



