मुंबई (प्रतिनिधी): १० जानेवारी -ज्योत फाउंडेशन आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘वसुधैव कुटुंबकम् संमेलन ४.०’ चे आयोजन १६ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे करण्यात येणार आहे, अशी अधिकृत घोषणा आयोजकांकडून करण्यात आली आहे.
हे संमेलन गच्छाधिपती जैनाचार्य युगभूषणसुरी महाराजांच्या पावन मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून, सध्या जगभरात निर्माण झालेल्या अनिश्चितता, मूल्यांचा ऱ्हास, विश्वासाचा अभाव आणि व्यवस्थात्मक संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर – म्हणजेच ‘संक्रमण काळा’त – या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारताकडे आशेने पाहिले जात असून, आपल्या प्राचीन सभ्यतागत मूल्यांवर आधारित मार्गदर्शन देण्याची अपेक्षा वाढत आहे.
भारतीय प्राचीन ज्ञानपरंपरेवर आधारित ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या १२ कालातीत तत्त्वांवर हे संमेलन आधारित आहे. कुटुंबापासून समाज, राष्ट्र आणि जागतिक स्तरापर्यंत न्याय्य, समतोल आणि स्थिर व्यवस्था उभी करण्याचा हा एक ठोस वैचारिक प्रयत्न असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

या उपक्रमाची ही चौथी आवृत्ती असून, मागील काही वर्षांत या मोहिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली आहे. यापूर्वी ग्लोबल साऊथ व वेस्ट आशियातील २३ देशांच्या दूतावासांचा सहभाग, आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ‘यरेवान डायलॉग २०२४’ साठी आमंत्रण, तसेच संयुक्त राष्ट्रसंघात दखल घेण्यात आली होती. भारताच्या माजी संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कांबोज तसेच संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्याशी संवादही झाला होता.
संमेलनाची वैशिष्ट्ये: कायदा, प्रशासन, भू-राजकारण, अर्थव्यवस्था, समाज आणि नैतिकता यांवर आधारित विषयवार सत्रे
न्यायमूर्ती, मुत्सद्दी, धोरणकर्ते, अभ्यासक यांच्यासोबत गोलमेज चर्चा
२५,००० चौ.फुट क्षेत्रफळाचे संशोधनाधारित प्रदर्शन – ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या १२ तत्त्वांचे सादरीकरण
संविधानाच्या ७५ वर्षांनिमित्त विशेष कायदेविषयक प्रदर्शन
विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्ट, मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN), पथनाट्य आणि ‘नालंदावाद’ उपक्रम
शिक्षण, पर्यावरण, माध्यमे, प्रशासन, उद्योजकता आदी विषयांवर दररोज पॉडकास्ट संवाद
माजी सरन्यायाधीश न्या. बी. आर. गवई, माजी सर्वोच्च न्यायालयीन न्यायमूर्ती न्या. बी. एन. श्रीकृष्णा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, भारताचे ॲटर्नी जनरल आर. वेंकटरमणी, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर, राजदूत रुचिरा कांबोज यांच्यासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मान्यवर सहभागी होणार आहेत.
संस्थात्मक भागीदार: या संमेलनाला विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, इंडिया फाउंडेशन, नालंदा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, गोखले अर्थशास्त्र संस्था, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे पाठबळ लाभले आहे.
संमेलनाच्या माध्यमातून भारताच्या सभ्यतागत मूल्यांवर आधारित न्याय, समता आणि मानवकल्याणाचा विचार जागतिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.



