महाराष्ट्रशहर

म्हाडाच्या पारदर्शक सोडतीने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केलाय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हर्षदा वेदपाठक

मुंबई

म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे हे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला नागरिकांकडून मिळणाऱ्या उस्फुर्त प्रतिसादावरून आपल्याला दिसून येते. सात दशकांत नऊ लाख घरांची निर्मिती करणारे प्राधिकरण सर्वसामान्यांच्या गृहस्वप्न पूर्तीचे खऱ्या अर्थाने आधारवड ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हाडाचा विभागीय घटक कोंकण मंडळाच्या ५३११ सदनिकांच्या वितरणाकरिता आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमामध्ये केले.


म्हाडाचा विभागीय घटक कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील ५३११ सदनिकांच्या वितरणाकरिता राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, ठाणे येथील आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात श्री शिंदे बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर,माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
अन्न, वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि यापैकी निवाऱ्याचा गरजेची पूर्तता ही काळाची आणि समाजाची गरज आहे. राज्यातील नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यास राज्य शासनासह केंद्र शासन देखील सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे श्री शिंदे यांनी सांगितले व ते पुढे म्हणाले की नुकटाच झालेला सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या रे नगर येथील गृहप्रकल्पाचा चावी वाटप कार्यक्रम म्हणजेच शासनाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वोत्तम उदाहरण ठरते. त्याचबरोबर गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरते. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचा निवारा मिळावा याकरिता शासन वेळोवेळी नवीन नियम संमत करून म्हाडाचे हाथ अधिक बळकट करीत आहे, असेही ते म्हणाले
ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाची अर्थव्यवस्था

प्रगतीपथावर असून आता अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात आणि राज्यात सर्वांगीण विकास होताना दिसतोय. शासनाकडून देण्यात येणारी ही सर्व घरे वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत. जे वेळेत घर पूर्ण करतील त्यांना सन्मानित करण्यात येईल तर जे काम वेळेत काम करणार नाहीत त्यांना निश्चितच दंड आकारण्यात येईल. शेवटी म्हाडा सदनिका सोडत 2023-24 मध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत त्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.
या प्रसंगी बोलताना गृहनिर्माण मंत्री श्री सावे यांनी उपस्थित अर्जदारांना सोडतीच्या शुभेच्छा दिल्या व सांगितले कि ज्या अर्जदारांना सोडतीत घरे लागणार नाही त्यांनी निराश होऊ नये. म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकाधिक गृहनिर्मिती होणार आहे ज्यामुळे घरांची मागणी व पुरवठा तफावत कमी होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी केले व मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मारोती मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.


यावेळी म्हाडाचे अधिकारी-कर्मचारी, सोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button