महाराष्ट्रविशेषशहर

मतदारांना लुटणार्‍या ‘खाजगी ट्रव्हल्स’वर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी – अभिषेक मुरुकटे

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने स्वत:चा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजारो मतदार आपल्या गावी वा मूळ ठिकाणी जात आहेत; मात्र या संधीचा अनुचित लाभ उठवत खाजगी ट्रव्हल्स कंपन्यांकडून अव्वाच्या-सव्वा प्रवासीभाडे आकारून मतदारांची अक्षरश: लुटमार चालू केली आहे. मतदार हे आपल्या क्षेत्रात जाऊन मतदान करू नये म्हणून खाजगी ट्रव्हल्सवाले एकप्रकारे खोडा घालत आहे कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रार करून आम्हाला कळवले आहे. तरी निवडणूक आयोगाने खाजगी ट्रव्हल्स कंपन्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून मतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.

   या संदर्भात ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने आवश्यक ते पुराव्यासह देऊन कठोर कारवाई मागणी एका निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. दिवाळीनंतर ५००-७०० रुपये असलेले मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकिटांचे दर १९ आणि २० नोव्हेंबरसाठी जवळपास दुपटीने १०००-१६०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. विशेषतः ऑनलाईन तिकिटिंग प्लॅटफॉर्मवरही अशीच भरमसाठ लुटमार चालू आहे. केवळ मुंबई-कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर या ठिकाणीच नव्हे, अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवासभाडे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. या भाडेवाढीमुळे मतदारांना त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदान करण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे, असेही मुरुकुटे यांनी सांगितले आहे. 


  मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. खाजगी बसमालक आणि प्रवासी एजंट यांनी भाडेवाढ करून एकप्रकारे मतदारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे, जो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. या समस्येवर तातडीने कठोर पावले उचलून प्रवास भाड्यांवरील ही अनैतिक दरवाढ तात्काळ थांबवावी आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी मूळ ठिकाणी पोहोचण्याची हमी द्यावी, असे ही  मुरुकटे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button