महाराष्ट्रविशेषशहर

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही – अजित पवार

शिर्डी – महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशापध्दतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडेतिकडे करणार्‍या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे हे कृतीतून दिसले पाहिजे. नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांमध्ये जा… हा पक्ष लोकांचा वाटला पाहिजे यासाठी काम करा असा आदेशही अजित पवार यांनी आजच्या शिबिरात दिला.

शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहिल. यासाठी तुमची साथ मला हवी आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर २५ कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात ५० कार्यकर्ते तयार करा. त्यातून २० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल. राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणूकीत पक्षाला फायदा निश्चित होणार आहे असेही अजित पवार म्हणाले.

साईबाबांच्या कर्मभूमीत आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीतून विकासाची दिशा आणि पुरोगामी विचाराची वाटचाल आपण नवसंकल्प शिबीरातून करत आहोत. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा फलक (बोर्ड) आणि झेंडा कसा लागेल असा प्रयत्न सर्वांनी करा अशी ताकीदही अजित पवार यांनी दिली.

हा महाराष्ट्र आहे. एकतेचा आणि समतेचा विचार इथे रुजलेला आहे. जातीपातीचे राजकारण जास्त दिवस चालत नाही. पण सध्या तशापध्दतीने सध्या जातीपातीचे राजकारण सुरू आहे याबद्दल नाराजीही अजित पवार यांनी व्यक्त केली.

महायुतीला बहुमत प्रचंड मिळाले असून जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपल्याला ती जबाबदारी पार पाडायची आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवायची आणि त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे याचा वेगळा विचार सध्या सरकार करत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत जे अभूतपूर्व यश पक्षाला मिळाले आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे,पदाधिकाऱ्यांचे असल्याची स्पष्ट कबुली अजित पवार यांनी दिली.

ज्यांची जनमानसात प्रतिमा खराब आहे त्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही असे स्पष्ट करतानाच पक्षात कुणाशीही गैरवर्तन होईल असे काम करणाऱ्या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल असेही अजित पवार यांनी जाहीर केले.

दरमंगळवारी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीला महिन्यातील एक दिवस ठरवून सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कामाबरोबरच पक्षाचाही कार्यक्रम घेणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.

आज अजित पवार यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय सहाय्यता कक्ष सेल आणि वचनपूर्ती सेल या दोन सेलची घोषणा केली. वैद्यकीय सहाय्यता सेल हा उपमुख्यमंत्री कार्यालयातून राबवला जाईल तर वचनपूर्ती हा सेल उपमुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

आता तुमच्या सगळ्या सहकार्याने राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून हे काम करायचे आहे. त्यासाठी विधानसभेत जसे दौरे केले त्याचपध्दतीने महाराष्ट्रात दौरे करणार आहोत असे अजित पवार यांनी जाहीर केले.

दोन दिवसाच्या शिबीरात ज्या वक्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या किंवा चांगले मार्गदर्शन केले त्यांचे कौतुकही अजित पवार यांनी केले.

पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करा – प्रफुल पटेल

पक्षाची मर्यादा ओळखून कार्यकर्त्यांनी श्रध्दा आणि सबुरीने पक्ष वाढीसाठी काम करायचे आहे. पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

लोकसभेत झालेल्या पराभवानंतर पाच महिन्यातच दादांच्या नेतृत्वाखाली पराजयाचा विजय करुन दाखवलात त्याबद्दल प्रफुल पटेल यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.

शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा सोडणार नाही असे पंतप्रधानांना महायुतीत जाताना सांगितल्याचे प्रफुल पटेल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याची संधी आपल्या जवळ आहे. कॉंग्रेस ज्यापध्दतीने चुकीचे मेसेज फिरवत आहे ते खोडून काढण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपली विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करायचे आहे. तसा निर्धार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात चांगले दिवस येतील असेही प्रफुल पटेल म्हणाले.

विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्या – सुनिल तटकरे

पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या २५ वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे.इथला विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचवला जाईल आणि वेगवेगळे कार्यक्रम दिले जातील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात दादांच्या रुपाने आपल्या पक्षाला चेहरा मिळाला आहे. मुंबईमध्ये दादांचा हाच चेहरा मनपा निवडणुकीत पुढे आणायचा आहे. मुंबई शहरात २५ वर्षात जितके कधी यश मिळाले नाही ते यश दादांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के मिळेल आणि आगामी काळात मनपात स्वतःच्या बळावर उभे राहण्याचा नक्की प्रयत्न केला जाणार आहे असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

जशी यशवंतराव चव्हाण यांची आधुनिक शिल्पकार म्हणून ओळख आहे तशी अजितदादांनी केलेल्या विकासामुळे आधुनिक शिल्पकार म्हणून नोंद होईल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

सदस्य नोंदणी अभियान आपण सुरु केले आहे. नोंदणीत जो चांगलं काम करेल त्याचा पक्ष नक्कीच विचार करेल.पक्ष संघटन वाढवत असताना आता आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

दादा…! गर्दी आणि तुम्ही याचं अतुट नातं आहे. दादा तुमची विचारांची उंची मोठी असल्यानेच हे घडत आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी दादांच्या कामाबाबत स्तुती केली.

नवीन पर्व येऊन समोर उभं राहिलं आहे. आता ३१ मार्चपर्यंत सभासद नोंदणी पूर्ण करायची आहे. दिवसाचे २४ तास आपल्याला पक्षासाठी काम करायचे आणि ते चढत्या क्रमाने असले पाहिजे आणि हे काम झोकून देऊन करा असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

या शिबीरात आजच्या दुसर्‍या दिवशी सकाळी संविधानावर आधारीत चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर ‘शिव – शाहू – फुले – आंबेडकर पुरोगामी विचारधारा’ या विषयावर लहूजी कानडे यांनी विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, नंतर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनीही आपले विचार मांडले.

या शिबीराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदितीताई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button