महाराष्ट्रशहर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो मार्ग १२ कल्याण ते तळोजा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ

मुंबई,

मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण आणि तळोजा या दोन महत्त्वपूर्ण शहरांना जलदगतीने जोडण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्ग १२ च्या कामाचा शुभारंभ करण्यात आल. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि माननीय उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग १२ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ झाल्यावर लगेचच पायलिंग च्या कामाला सुरुवात झाली. ही मेट्रो मार्गिका मुंबई महानगर प्रदेशातील दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवीमुंबई, विरार, मीरा-भाईंदर शहराना जोडून एक नवी आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूक प्रणाली उदयास येणार आहे. तसेच ही मेट्रो मार्गिका या भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आणि मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांत समान रोजगार संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येसाठी अपूऱ्या पडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर उपाय योजना करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असणारे आधुनिक परिवहन जाळे निर्माण करण्याचा पूर्णपणे अभ्यास केला. त्यानुसार हा सर्वंकष परिवहन अभ्यास सन २००८ मध्ये पूर्ण केला. या सर्वंकष वाहतूक अभ्यासानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांबीचे मेट्रोच्या जाळे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो मार्ग १ च्या माध्यमातून मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका सन २०१४ मध्ये सुरू झाली आहे. तर मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या माध्यमातून मुंबईतील पहिले मेट्रो नेटवर्क २०२३ साली अस्तित्वात आले आहे. सद्य स्थितीत ४६.५ किमी लांबीच्या ३ मार्गिका कार्यान्वित असून सुमारे १४६ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांची उभारणी एकाच वेळेस सुरू आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई महानगर प्रदेशातील अस्तित्वातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण नक्कीच कमी होणार असून त्यासोबतच शहरे एकमेकांस जलदगतीने जोडली जाणार आहेत. ज्याचा फायदा शहरांच्या विकासासोबतच रोजगार निर्मितीच्या दृष्टीने आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक असणार आहे. तसेच सर्व मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यावर जगातील हे सर्वात मोठे मेट्रो मार्गिकांचे जाळे ठरणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली या शहरातील वाढती लोकसंख्या तसेच आसपासच्या भागांचा झपाट्याने होणाऱ्या विकास लक्षात घेता ही शहरे नवी मुंबईला जलद गतीने जोडण्याची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्ग ५चा विस्तार तळोजा पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो मार्गिका १२ ची लांबी २२.१७३ किमी असून या मार्गिकेत एकूण १९ उन्नत स्थानकांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत सुमारे ५,८६५ कोटी रुपये इतकी असून २०२७ च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमार्गिकेमुळे दक्षिण मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली आणि नुसता नवी मुंबई नाहीतर तळोजा पासून मीरा-भाईंदर आणि अंधेरी असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होणार असल्याने प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि पर्यावरणपूरक असा प्रवास करता येईल. ही मार्गिका पूर्ण झाल्यावर सुमारे २.६ लक्ष नागरीक प्रवास करतील असा अंदाज आहे. तसेच ठाणे भिवंडी कल्याण या भागात मोठं मोठे कारखाने, कोठार , भांडारगृह आहेत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या नागरिकांना वाहतुकीसाठी मेट्रोच्या रूपात एक सक्षम वातानुकूलित वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

कल्याण – तळोजा मेट्रो मार्गिकेचे फायदे

कल्याण – तळोजा दरम्यानच्या या मेट्रो १२ मार्गिकेचा उद्देश हा मुंबई, ठाणे , नवी मुंबई भागातील विकासाला गती देणे हा आहे. कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग १२ हे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबई दरम्यानची जोडणी सुधारण्याचे उद्दिष्टाने प्रस्तावित केली आहे. मेट्रो १२ प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी आणि मुंबई येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. ही मार्गिका इतर मेट्रो मार्गांशी एकरूप होऊन एकमेकांशी जोडलेले नेटवर्क तयार करणार आहे. हा मार्ग कासारवडवली-वडाळा मेट्रो ५ आणि नवी मुंबई मेट्रोला जोडला जाऊन सर्वसमावेशक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. मेट्रो मार्ग १२ ही केवळ कनेक्टिव्हिटी सुधारून सध्याच्या वाहतूक गरजा पूर्ण करणार नसून प्रामुख्याने या भागांतील विकासासाठी उत्प्रेरक ठरणार आहे. तसेच प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येणार आहे . मुंबई मेट्रो मार्ग १२ च्या उपलब्धतेमुळे गुंतवणूक आकर्षित करून आणि मेट्रो स्थानकांभोवती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना देऊन आर्थिक वाढीस चालना देऊ शकते. हा मेट्रो मार्ग वाहतुकीचा एक सुरक्षित आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करेल, ज्यामुळे रस्त्यावरील प्रवासाशी संबंधित अपघातांचा धोका कमी होईल. हे रहिवासी आणि अभ्यागतांसाठी गतिशीलता वाढवू शकते.प्रस्तावित मेट्रो मार्गिकेमुळे वाहनांच्या संख्येत घट झाल्याने रस्ते बांधणी आणि देखभाल याचा खर्च कमी होईल.मुंबई मेट्रो मार्ग १२ मुळे लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करून, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाहतूक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होईल. अधिक लोक त्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रोची निवड करत असल्याने, इंधनाच्या वापरात घट झाल्यामुळे हरित वायू (Greenhouse Gases) उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल वायू प्रदूषण कमी होणार आहे, डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर न करता इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड मेट्रो गाड्यांकडे वळल्याने वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते, ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला फायदा होणार आहे, वाहतूक व्यवस्थापन सुधारून प्रवाश्यांना उत्तम आरामदायी व्यवस्था मिळेल, त्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारेल. सदर मार्गिका ही सिडको व एमआयडीसी क्षेत्रातून जात असल्याने या क्षेत्रांना भविष्यातील प्रगतीला वाव मिळेल. या मार्गिकेचा उद्देश मुंबई शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील विकास कामांना गती देणे आहे.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष श्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेशातील या महत्त्वपूर्ण वाहतूक सुविधा प्रकल्पाच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान म्हणाले, “पायाभूत सुविधांच्या विकासात आणि आर्थिक वाढीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. ज्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वात मोठा वाटा आहे. मुंबई मेट्रो ही प्रगत वाहतूक प्रणाली असल्यामुळे ती शाश्वत आणि पर्यावरणपूरक अशी वाहतूक व्यवस्था असणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईमध्ये उभारण्यात येत असलेल्या मेट्रो नेटवर्कमुळे या प्रदेशाचा त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती प्राप्त होणार आहे. सध्या कार्यान्वित असलेली मेट्रो मार्गिका दररोज लाखो नागरिकांना सेवा देत असून तिच्या प्रवासी संख्येत दररोज वाढ होत आहे. आज मुंबई महानगर प्रदेशातील एक अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो मार्गिकेच्या कामांचा शुभारंभ आम्ही करत आहोत. जिच्या कार्यान्वयनानंतर मुंबई, ठाणे, नवीमुंबई या भागांसाठी व्यावसायिक वाढीस उत्प्रेरक ठरणार असून प्रगतीची एक नवी दिशा नागरिकांना मिळणार आहे. महाराष्ट्र सरकार जनतेच्या हितासाठी आणि नागरिकांना जागतिक दर्ज्याच्या सुविधा उभारण्यासाठी सदैव तत्पर आहे.”

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी, भा प्र. से. , मेट्रो मार्ग १२ या महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारताना म्हणाले “माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शासनाच्या सहकार्याने आम्ही मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोच्या जाळे उभारत आहोत. आज मेट्रो मार्ग १२ च्या कामाचा शुभारंभ झाला असून मेट्रो मार्ग १२ मुळे कल्याण आणि तळोजा दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारणार असून या भागातील नागरिकांना वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण व तळोजा दरम्यानचा प्रवासाच्या वेळत ४५ मिनिटांची बचत होणार असल्याने नागरीक त्यांच्या कुटुंबीयांना आणखी वेळ देऊ शकणार आहेत. हा प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केलं असूनआजपासूच मेट्रोच्या कामाला सुरवातही झाली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button